Friday 1 January 2021

सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद


सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद
प्रत्येकच धर्म समाजात काहीतरी अनिष्ट रूढी परंपरा पाळल्या जातात त्या हळूहळू कालानुरूप नष्ट होतात, अशीच एक आताच काळात सुद्धा सुरु असलेली अनिष्ट रूढी म्हणजे सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद हा भेदभाव स्त्रियांमध्येच आजसुद्धा मुख्यतः पाळल्या जातो.

आता पहिले तर यामधला फरक समजवून घेऊ सवाष्ण म्हणजे काय जिचा पती जिवंत आहे अशा स्त्रीला सुवासिनी किंवा मराठीत सवाष्ण असे म्हटले जाते. सवाष्ण हा शब्द विवाहित स्त्री दर्शवितो आणि त्याच्या विरोधात विधवा स्त्रीची प्रतिमा उभी करतो म्हणजेच असवाष्ण.
भारतीय व्यक्ती आणि त्या सुद्धा मराठी माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आणि यात सुद्धा फक्त महिलांना साजरे करायला अनेक सण आहे, सण उत्सव साजरा केल्यामुळे लोक एकत्र येतात आनंद साजरा करतात पण ह्याच सणांमध्ये एका स्त्री ला चांगली वागणूक आणि एका स्त्रीला दुय्यम वागणूक का दिली जाते ?

आता उदाहरण द्यायचेच झाले तर हळदी कुंकू, मंगळागौर किंवा डोहाळजेवण वगैरे चा कार्यक्रमाचं, या किंवा अश्या अनेक कार्यक्रम स्त्रिया फक्त सवाष्ण स्त्रीलाच आमंत्रण देतात किंवा अश्या स्त्रियांनाच तिथे आमंत्रण दिल्या जाते ज्या सवाष्ण असतात अश्यावेळी तिथे एखादी असवाष्ण स्त्री तिथे पोहचली कि तिचा कडे वेगळ्याच नजरेने पहिल्या जाते किंवा चारचौघी मध्ये वेगळीच कुजबुज होते, एखादी स्त्री सवाष्ण नसेल तर तिला तिथे उपस्तिथ राहण्याचा हक्क सुद्धा नसावा का ?

इतर सुद्धा अनेक कार्य्रमात लग्न आणि इतर अनेक पूजे मध्ये औक्षण असो किंवा गिफ्ट म्हणजे वाण देणे असो किंवा गजरा घालणे ह्या गोष्टीचा अधिकार सुद्धा असवाष्ण स्त्रीला दिला जात नाही,एखाद्या स्त्रीला आपल्या मुलांना किंवा नातेवाईक लोकांना औक्षण करायचा अधिकार असू नये का, एखादी स्त्री सवाष्ण नाही यात त्या स्त्रीचा काय दोष असतो ?

आपण स्त्रियांचे दाखले देताना जिजामाता, राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई यांचे दाखले देतो या सर्व स्त्रिया जेवढ्या त्यांचे पती असताना शूरवीर होत्या तेवढ्याच पती नसताना सुद्धा, मग जर आजसुद्धा आपण यांचे दाखले देतो तर हा भेदभाव आजसुद्धा का पाळल्या जातो ,एखाद्या व्यक्तीला फक्त तिचा सवाष्ण असण्या नसण्या वरून मान देत असू भलेही तिचं लोकांशी वागणूक योग्य असो कि अयोग्य.
सवाष्ण असवाष्ण असण्याचा आणि त्या स्त्रीचा कुठेही काहीही दोष नसतो असे असताना हि दुय्यम वागणूक २१ व्य शतकात सुद्धा का जोपासली जाते, आज स्त्रिया अंतराळात जात आहे, साक्षी मलिक पासून सायना नेहवाल पर्यंत अनेक नाव आपण खेळामध्ये घेतो मग तरीही हा भेदभाव कुठपर्यंत जोपासनार.

ज्या प्रमाणे समाजात इतर अनेक अनिष्ट प्रथा समाजातून नष्ट झाल्या त्याप्रमाणेच सवाष्ण असवाष्ण भेदभाव सुद्धा नष्ट व्हायला स्त्रियांनी पुढाकार घेणे गरजेचे, कारण एक स्त्री हि दुसऱ्या स्त्रीची आई बहीण सासू किंवा मैत्रीण नक्कीच असते, कालानुरूप बदल आणि परिवर्तन हि समाजाची गरज आहे अश्यावेळी स्त्रियांनीच या विरोधात एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे
- प्रसाद पाचपांडे
अमरावती